खेड पोलीसांनी रेल्वे थांबवून लावला अपहरण नाट्याचा छडा

खेड:- मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाण्यातून 03 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली. “मांडवी एक्सप्रेस” या धावत्या रेल्वेमध्ये असल्याबाबत माहिती देऊन त्यांचा शोध घेणेबाबत विनंती करण्यात आली.

त्यानुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच सहा. पोलीस निरीक्षक श्री. सुजीत गडदे, खेड पोलीस ठाणे यांनी आपल्याकडील 2 पोलीस अधिकारी, व 8 अंमलदार अशी वेगळी पथके तयार केली व 12:05 वा. खेड रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस च्या तपासणीच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनासोबत समन्वय राखून, ही रेल्वे 05 मिनिटे अधिक कालावधी करिता खेड रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली.

होळी सणाच्या निमित्ताने कोकणामध्ये जाण्या-येण्या साठी नागरिक रेल्वे मध्ये अधिक गर्दी करत असतात याची पूर्ण कल्पना तसेच वेळेची मर्यादा असताना देखील या तीनही मुलींचा “मांडवी एक्सप्रेस” मध्ये कसून शोध घेण्यात आला व अखेरीस या मुली, रेल्वेच्या एका बोगी मध्ये बसलेल्या सापडल्या.

या तीनही मुलींना खेड पोलीस ठाणे येथे सुखरूप आणण्यात आले आहे. या मुलींकडे अधिक चौकशी केली असता, “या मुली त्यांचे घरा शेजारील गार्डन मध्ये फिरण्यासाठी गेल्या होत्या व त्यांना घरी जाण्याकरीता उशीर झाल्याने, आपले पालक आपल्याला आता ओरडतील, या भीतीने त्या निघाल्या होत्या.

या तीनही मुलींना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याकरिता काशीमीरा पोलीस ठाणे येथील पथक खेड पोलीस ठाणे करिता रवाना झाले आहे. ही कारवाई, खेड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. सुजीत गडदे तसेच त्यांच्या पथकातील 2 पोलीस अधिकारी व 8 पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.