रत्नागिरी:- गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या ८२ वर्षीय वृद्धाचा मृतदेह तालुक्यातील वेळके-पिंपळाची साखळी परिसरातील जंगलात आढळून आला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नारायण धोंडू सुवारे ( ८२, रा. खानू गोवंडेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण सुवारे हे २७ मे रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते परत न आल्याने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद (क्रमांक १७/२०२६) करण्यात आली होती. नातेवाईक आणि पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.
सुवारे यांना दम्याचा, उच्च रक्तदाबाचा तसेच थायरॉईडचा त्रास होता. शोधमोहीमे दरम्यान वेळके-पिंपळाची साखळी परिसरातील जंगलमय भागात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू असून रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









