रत्नागिरीतील खाड्यांमध्ये गाळ साठण्याचे कारण सह्याद्रीच्या पायथ्याशी 

रत्नागिरी:- खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य विभागाने दिला आहे; मात्र खाड्यांमध्ये नेमका गाळ कसा साठतो, याचे गुपित सह्याद्री पर्वतात लपले आहे. जिल्हा हा सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आहे. सह्याद्रीमध्ये वर्षानुवर्षे बेकायदा वृक्षतोड सुरू आहे. वृक्षांनी पकडलेली माती सुटून पाण्याबरोबर समुद्राच्या मुखापर्यंत जाते; मात्र समुद्र पोटात घेत नाही. ती माती, वाळू समुद्र बाहेर टाकतो. त्यामुळे खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचतो. हे थांबविण्यासाठी सह्याद्रीतील वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवड केली पाहिजे.

माती धरून ठेवण्यासाठीच्या उपाय करणे हाच यावरील कायमचा तोडगा आहे, असे स्पष्ट मत माजी कुलगुरू आणि पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले.मत्स्य विभागाने जिल्ह्यातील २० खाड्यांमधील गाळ काढण्याचा प्रस्ताव मत्स्य आयुक्तांकडे दिला आहे. खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिपीची झाडे, खारफुटी आदी वनस्पती आहेत. त्याचा समुद्री जीवांना फायदा होतो; मात्र खाड्या गाळाने का भरत आहेत, याचे पर्यावरणीय कारण विलक्षण आहे. म्हणून याबाबत माजी कुलगुरु कद्रेकर यांच्याशी चर्चा केल्यानतंर याचा उलगडा झाला.

ते म्हणाले, गाळ काढण्याच्या प्रस्तावामध्ये खाडी उपसायची नाही तर होड्या किंवा ट्रॉलरसाठी मार्ग करायचा आहे. जेणेकरून होड्या, ट्रॉलर्सचे अपघात टळतील. पण हा आजवर केलेला तात्पुरता उपाय आहे. खाड्यांमध्ये गाळ साचण्याचे मूळ कारण सह्याद्री पर्वतात लपले आहे. सह्याद्री पर्वतावर अनेक वर्षांपासून वृक्षतोड सुरू आहे. वृक्षाची मुळं माती धरून ठेवतात. परंतु या वृक्षतोडीमुळे माती सुटून पावसाळ्यादरम्यान ती वाहून समुद्राच्या मुखापर्यंत येतात. समुद्र पोटात काही घेत नाही. सर्व बाहेर टाकतो, त्यानुसार ही सर्व माती, वाळू बाहेर फेकली जाते. त्यामुळे खाड्या गाळाने भरल्या आहेत. सह्याद्रीतील वृक्षांची भरमसाठ होणारी कत्तल थांबली पाहिजे. यापूर्वी बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठानेही सह्याद्री सुरक्षित करण्याबाबत सांगितले होते; मात्र त्यावर विचार झालेला नाही. त्याचा हा दुष्परिणाम आहे.