रत्नागिरी:- देशाला क्षयरोग मुक्त बनवण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्वत्र क्षयरुग्णांचा शोध घेतला जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दि. 22 पासून सर्वेक्षण सुरु झाले आहे.
जिल्ह्यामध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णांचे प्रमाण कमी होत आहे अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे सब नॅशनल सर्टिफिकेशन उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड केंद्र स्तरावरुन करण्यात आली आहे व त्या गावात स्वयंसेवकांमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे, तसेच केंद्रस्तरीय पथकाद्वारे या सर्वेक्षणाचे पर्यवेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणासाठी रत्नागिरी तालुक्यातील नाचणे वॉर्ड क्र. 7, पाली बाजार पेठ, राजापूर तालुक्यातील केळवली, लांजा तालुक्यातील गोंडेसखळ, संगमेश्वर तालुक्यातील सायले, चिपळूण तालुक्यातील शिरगाव, खेड तालुक्यातील असगणी महोल्ला, दापोली तालुक्यातील बुरोंडी, गुहागर तालुक्यातील पालशेत, मंडणगड तालुक्यातील कुंबळे या गावांची निवड करण्यात आलेली आहे.
या सर्वेक्षणाचे सर्व नियोजन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. या सर्वेक्षणासाठी आपल्या घरी येणार्या स्वयंसेवकास योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.









