क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीचे धरणे 

शंभर टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याची मागणी 

रत्नागिरी:- राज्यातील सर्व अंशतःअनुदानित, अघोषित, त्रुटीअपात्र  शाळांना 100% प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज  ९ ऑगस्ट क्रांतिदिनी रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी व मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक  जि. प. रत्नागिरी यांना निवेदन देऊन शासनाच्या जाचक अटी व मनमानी कारभार याचा जाहीर निषेध करीत १००% अनुदानाची आग्रही मागणी केली आहे.  
   

विनाअनुदानित शिक्षकांवर गेल्या २०  वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे.सर्वच विनाअनुदानित शाळा आज १००% प्रचलित नियमानुसार अनुदानास पात्र असताना काहींना २०% तर काहींना ४०% अनुदान देऊन शासनाने  बोळवण केली आहे.तर बऱ्याच शाळांना अजून एक रुपया देखील अनुदान नाही.जवळपास वीस वर्षे विनाअनुदानित शाळेत सेवा करून काही शिक्षक बिनपगारी निवृत्त झाले आहेत तर काही येत्या एक-दोन वर्षात निवृत्त  होतील.       

भारतीय संविधानात सर्वांना समानतेची संधी असताना,’समान काम-समान दाम’ या तत्वानुसार अनुदानित शिक्षकांप्रमाणेच विनाअनुदानित शिक्षकांना वेतन मिळणे हा आमचा केवळ हक्कच नसून तो आमचा अधिकार आहे. मात्र शासन हेतुपुरस्सर आमच्या बाबतीत झोपेचे सोंग घेत असल्याने शासनाला झोपेतून जागे करण्यासाठीच संघटनेचे राज्यभरात ढोलवादन व घंटानाद आंदोलन करून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन सर्व  विनाअनुदानित शाळा यांना  प्रचलित धोरणानुसार १००% अनुदान मिळावे.  त्रुटी पूर्तता शाळा यांना निधीसह घोषित करून त्वरित अनुदान सुरू करणे तसेच अघोषित शाळा १००% निधीसह घोषीत करणे  विनाअनुदानित शाळेतील कर्मचारी यांना सेवासंरक्षण मिळावे या आदी मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट नंतर राज्यभरातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेचे वतीने देण्यात आला आहे. 
       

सदरचे आंदोलन महाराष्ट्र राज्य  विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष  खंडेराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, सचिव  प्रकाश हर्चेकर,  जिल्हा सल्लागार संदेश कांबळे, इम्रान अलवारे, विठोबा भोसले, मारुती कुर्ले, विजय महाले, अमोल चव्हाण अन्सारी तौशिफ, जितेंद्र गजभार,अविनाश शिंदे,आदी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.