‘कौन बनेगा करोडपती’मध्ये चमकली रत्नकन्या!

५० लाख जिंकणार्‍या शिक्षिकेवर अभिनंदनाचा वर्षाव

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणार्‍या रत्नकन्येने केबीसी(कौन बनेगा करोडपती)च्या प्लॅटफॉर्मवर कोकणचा झेंडा फडकावला आहे. १२ व्या सिझनमध्ये १ करोडच्या प्रश्‍नापर्यंत पोहोचलेल्या रत्नागिरीच्या भावना वाघेला यांनी १५ वा प्रश्‍न क्विट करत गेम सोडल्याने ५० लाखाचे बक्षिस जिंकणार्‍या त्या पहिल्या रत्नकन्या ठरल्या आहेत.

कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर आत्मविश्‍वास असणे गरजेचे आहे. आज अनेक लोक स्वप्न बघतात. कोणाला अंबानींप्रमाणे श्रीमंत बनायचं असतं तर कोणाला परदेशी जाण्याचं स्वप्न असतं. काहींना तर सिनेकलाकारांसोबत आपले क्षण घालवावे, असे वाटत असते. मात्र रत्नागिरीतील एक प्राथमिक शिक्षिका त्याला अपवाद ठरली आहे.

आजपर्यंत कौन बनेगा करोडपतीचे ११ सेशन पूर्ण झाले असून सध्या १२ वे सेशन सुरु आहे. पहिल्या सेशनपासूनच अनेक महिला केबीसीच्या फ्लॅटफॉर्मवर सुपरस्टार अमिताब बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर बसलेल्या पहायला मिळाल्या. मात्र कोकणातील महिला त्याला अपवाद ठरल्या होत्या. आज कोकणातील महिला देखील कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, त्याही अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर बसू शकतात हे या प्राथमिक शिक्षिकेने दाखवून दिले आहे.

रत्नागिरीच्या दामले विद्यालयात प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करणार्‍या भावना प्रविण वाघेला यांनी केबीसीच्या पहिल्या सत्रापासून प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ११ व्या सिझनपर्यंत त्यांना केबीसीमध्ये प्रवेश मिळवता आला नाही अथवा नशिबाने त्यांना साथ दिली नाही. मात्र निराश न होता त्यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. या प्रयत्नाला यश येवून  १२ व्या सिझनमध्ये त्यांना केबीसीचा जॅकपॉट लागला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सुरुवातीपासूनच केबीसीमध्ये जाण्याची जिद्द आणि मी एक ना एक दिवस सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोरील हॉटसीटवर बसण्याचे पाहिलेले स्वप्न या शिक्षिकेने आज पूर्ण करुन दाखविले. प्रत्येक व्यक्ती स्वत:चा प्रपंच अथवा कुटुंब चालविण्यासाठी धडपड करीत असतो. भावना यांचे पती प्रविण वाघेला, यांनी आपल्या मित्रासमवेत भंगाराचा व्यवसाय सुरु केला होता. त्यासाठी ५० लाख रुपयांचे भांडवल गोळा करण्याचे त्यांनी ठरविले होते. यासाठी त्यांनी विविध मार्गाने पैसे गोळा केले. आईची जमीन विकून तसेच पैसे साठविले. साठलेली ही रक्कम पतीच्या मित्राला देण्यात आली. मात्र ही रक्कम हातात पडल्यानंतर पतीचा मित्र पळून गेला आणि वाघेला कुटुंबाला मोठा धक्का बसला होता.

सुरुवातीपासूनच महानायकासमोर भडाभड उत्तरे देणार्‍या या कोकणकन्येने केबीसीचा फ्लॅटफॉर्मच डोक्यावर घेतला. आतापर्यंत तीन महिलांनीच केबीसीमधून १ कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे. त्यामुळे कोकणकन्या देखील १ कोटी रुपये मिळवणार, असा विश्‍वास सार्‍यांना होता.
देवी और सज्जनो असे उद्गार अमिताभ बच्चन यांच्या तोंडून निघाले आणि त्यांनी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्‍न भावना वाघेला यांना केला. १५ व्या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या महिला ऍथलिटने सर्वात जास्त मेडल मिळवली आहेत? असा प्रश्‍न होता. सार्‍यांचीच धाकधूक वाढली होती, लाईफलाईन देखील संपल्या होत्या. देशवासियांच्या नजरा टिव्ही स्क्रीनवर असतानाच या कोकणकन्येने १५ व्या  प्रश्‍नाला गेम क्विट केला आणि ५० लाखाची मानकरी होण्याचा मान या कोकणकन्येने मिळवला आहे.