स्वॅब तपासणी बंद असल्याचा भाजपकडून आरोप
रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेवरून वाद निर्माण झाला आहे. स्वॅब तपासणी करणारे कर्मचारी नसल्याने प्रयोगशाळेचे काम बंद आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये नागरिकांना वेळेवर अहवाल मिळणार नसेल तर संसर्ग कसा रोखणार, असा प्रश्न भाजपचे चिटणीस राजू भाटलेकर यांनी उपस्थित केला आहे. मात्र प्रयोगशाळा बंद नाही, स्वॅब टेस्टिंग सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांनी काम थांबविले असले तरी आम्ही आमचे कर्मचारी लावून काम सुरू ठेवले आहे. काही प्रमाणात गती मंदावली असली तरी प्रयोगशाळा सुरू आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी स्पष्ट केले.
गेले काही दिवस शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेत स्वब तपासणीसाठी असणारे कर्मचारी वर्गच नाही. ज्या एजन्सीद्वारे हे कर्मचारी नेमले होते, त्यांची मुदत संपली आहे. नव्याने कर्मचारी वर्ग शासकीय रुग्णालयाने घेतला नाही. त्यामुळे प्रयोगशाळेतील स्वॅब तपासणीचे काम बंद आहे.चाचण्या वाढवल्यामुळे प्रयोगशाळेवर ताण पडू नये, यासाठी मुंबईला काही अहवाल पाठविले जातात. वेळेवर अहवाल आले तर पुढील खबरदारी घेऊन संसर्ग रोखता येईल. मात्र या प्रयोगशाळेचे काम बंद असल्याने वेळेवर अहवाल न मिळाल्यास स्वॅब घेतलेले कुठेही फिरतील आणि संसर्ग वाढवतील, असा आरोप भाजपचे चिटणीस राजू भाटलेकर यांनी केला आहे. ज्या लोकांना परदेशी किंवा इतर ठिकाणी जायचे आहे, त्यांना वेळेवर तपासणी अहवाल मिळत नसल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत, असेही स्पष्ट करून जिल्हा प्रशासन दररोज कोरोनाचा आढावा घेते, यामध्ये हा प्रश्न पुढे आला नाही का, त्यावर का पर्याय काढला नाही, असे प्रश्न भाटलेकर यांनी उपस्थित केले आहेत.









