कोरोनाने हापूस प्रक्रिया उद्योगांवर संकट 

छोटे मोठे उद्योग अडचणीत; कोट्यवधीचा माल पडून

रत्नागिरी:- फळांचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस उन्हाळयातील चार महिने आपल्याला चाखायला मिळतोच, मात्र आमरस वर्षाच्या बारा महिनेही आपण खाऊ शकतो. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगातून आमरससह आंबावडी तयार केली जाते. हे पदार्थ देशासह जगातील अनेक देशात पोहचतात. या उद्योगावरही कोरोनामुळे संकट कोसळले आहे. हापूसवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग, छोटी युनिट कोरोनामुळे  अडचणीत आली आहेत. अनेक युनीट बंद आहेत. मालाला मागणी नाही, त्यामुळे काही युनिटमध्ये तयार झालेला आमरस पडून आहे. 

कोरोनामुळे आंबा प्रक्रिया क्षेत्रातील शेकडो कोटींची उलाढाल ठप्प झाली असून हजारो कुटुंबं सध्या आर्थिक विवंचनेत  आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत कोकणात मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करत आमरस तयार केला जातो. त्यानंतर वर्षभर हाच आमरस सर्वत्र पोहोचवला जातो. पण, यवर्षी मात्र चित्र पूर्णपणे वेगळे आहे. अनेक प्रक्रिया उद्योगांमध्ये आमरस तयारच केला नाही. शिवाय ज्यांनी तयार केलाय त्यांच्या मालाला बाजारपेठेत मागणी नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठं आर्थिक संकट या उद्योगावर आले आहे.
 

रत्नागिरीपासून जवळच असलेल्या पावस येथील उद्योजक आनंद देसाई यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना  ते म्हणाले, कोरोनामुळे नक्कीच या व्यवसायावर मोठं संकट उभं राहिलं आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या कालवधीत लाखो टन आंब्यापासून आमरस तयार केला जात असे. त्यानंतर हाच माल वर्षभर जगाच्या बाजारपेठेसह देशातील इतर ठिकाणी देखील पाठवला जात आहे. पण, यवर्षी  सर्व ठप्प आहे. टाळेबंदीमुळे जिल्ह्यांच्या सीमा बंद असल्यानं इतर राज्यांतून किंवा जिल्ह्यांमधून देखील मजूर आणणं शक्य झालं नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. शिवाय, उत्पादन केल्यानंतर देखील तो पाठवणार कुठे, असा प्रश्नच होता आणि आहे. हॉटेल, रेस्टारंट बंद असल्यानं मागणी नाही. मिठाईची दुकानं देखील बंद त्यामुळे त्या ठिकाणाहून देखील मागणी नाही. तर, सण साजरे करताना देखील लोक बाहेर पडली नाहीत. परिणामी दुकानांमध्ये होणारी मागणी देखील घटली असल्याचे त्यांनी सांगितले.
 

आनंद देसाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रक्रिया उद्योग चालवतात. केंद्र सरकारनं केलेल्या आर्थिक साहाय्यातून हा प्रकल्प उभा राहिला आहे.आता कारखान्याचं दुसरं वर्ष. एप्रिल ते जून या कालावधीत साधारण ५० ते ६० कोटींची उलाढाल या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. पण, यंदा १०० ग्राम देखील आमरस तयार झाला नाही. मागणी नाही, कर्मचार्यांची वाणवा, बाजाराची स्थिती त्यामुळे सर्व ठप्प असल्याचे त्यांनी सांगितले.

तर रत्नागिरी जिल्ह्यातील इतर छोट्या‚ मोठ्या युनिट्सची देखील हिच स्थिती आहे. काहींनी जरी आमरस तयार केला असला तरी त्याला मागणी नाही. शिवाय, कोकणातील रानमेव्यावर प्रक्रिया करत इतर देखील पदार्थ तयार केले जातात. पण, त्यांची अवस्था काही वेगळी नसल्याची माहिती देसाई यांनी दिली.
प्रक्रिया उद्योग दोन महिन्याचा वाटत असला तरी त्यासाठी सहा महिने किंवा त्यापेक्षा देखील जास्त काळ मेहनत असते, आंब्याच्या बागांमध्ये जवळपास वर्षभर मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर त्याचं फळ मिळतं. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या या उद्योगाकडे सरकारनं लक्ष देत आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

व्याज, हप्ते रखडले;नव्या हंगामातही अडचणी
जगातील अनेक देशात रत्नागिरीचा आमरस पोहचतो. मात्र जवजवळ सर्वच देशात गेले काही महिने लॉकडाऊन आहेच. तर विमान वाहतूक सेवा बंद असल्याने परदेशात आमरसची मागणी पुर्णत: ठप्प झाली आहे. तर देशाअंतर्गतही हिच स्थिती कायम असल्याने उद्योजकांचे पैसे अडकले आहेत. तर बँकांचे व्याज, हप्ते रखडले आहेत. नव्या  हंगाम सुरु होण्याची वेळ आली असली तरी बँका नवीन कर्ज देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे नव्या हंगामातही अनेक अडचणी आहे.