कोरोनाने जिल्ह्यात नव्याने सात मृत्यूची नोंद; 24 तासात केवळ 22 रुग्ण

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात केवळ 22 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मात्र वाढत जाणारी मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. जिल्ह्यात नव्याने सात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून जिल्ह्याचा मृत्युदर वाढून 3.13 टक्क्यांवर पोहचला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 28 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 939 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.51 टक्के आहे. नव्याने 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 688 इतकी झाली आहे. 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने सात रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. सात पैकी यापूर्वीचे 4 तर 24 तासातील 3 मृत्यू आहेत. रुग्णसंख्या घटत असताना वाढणारी मृत्यूसंख्या आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय बनत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 460 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 165 तर संस्थात्मक विलगीकरणात 124 रुग्ण उपचार घेत आहेत.