कोरोनाची रुग्णसंख्या घटली; अनावश्यक कोविड सेंटर बंद 

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे 35 पैकी 8 कोविड केंअर सेंटर सुरु आहेत. उर्वरित केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एक हजार बाधित उपचाराखाली असून जिल्हा कोविड रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु ठेवण्यात आले आहेत.

दुसरी लाट सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात दिवसाला पाचशे बाधित सापडत होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोवीड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा कोविड रुग्णालयासह (महिला रुग्णालय) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली गेली. तालुकास्तरावर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांवर खाटांची व्यवस्था केली. तरीही उपचारासाठी बेड कमी पडू लागल्यामुळे विविध ठिकाणी कोविड केंअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साधारण मार्च महिन्यात ही केंद्र सुरु झाली. रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्यात वाढ केली गेली. जिल्ह्यात अशी सुमारे 35 केंद्र सुरु झाली होती. कमी लक्षणे असलेले आणि लक्षणेविरहीत बाधितांना तिथे ठेवण्यात येत होते. गंभीर असलेल्यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाई. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कोरोना बाधित सापडण्याचा दरही कमी झाला आहे. बरे होणार्‍यांचा टक्का 95.48 टक्केवर पोचला आहे. कोविड केअर सेंटरमधील बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात निर्माण केलेली 27 केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या दापोली 1, खेड 1, संगमेश्‍वर 1 आणि रत्नागिरीत 5 केंद्र सुरु आहेत. दरम्यान, तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून वेळ पडल्यास ही केंद्र पुन्हा सुरु करण्याची तयारीही ठेवल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.