कोकण किनारपट्टीला अलर्ट; मच्छीमारी नौका बंदरात

रत्नागिरी:- कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर दि. २९ व ३० मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून, मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत.

यावर्षी आधीच २५ ते ३० टक्के इतकेच आंबा उत्पादन आहे. त्यातच थ्रीप्स, तुडतुडा, फळमाशीचे संकट ओढावले आहे. आधीच दुष्टचक्रात आंबा सापडलेला असताना, पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी नौका किनारपट्टीवर उभ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच काही नौका समुद्रातून माघारी परतल्या आहेत. मिरकरवाडा, राजीवडा, मिऱ्या, साखरतर, जाकादेवी, कासारवेली, जयगड, नाटे, हर्णे येथील बहुतांश नौका सोसाट्याच्या वाऱ्याच्या भीतीने किनाऱ्यावर स्थिरावल्या आहेत.