केबल पुलामुळे दुर्गम कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार

खेड:- कोयना धरणाच्या आतील दुर्गम भागातील दळणवळण सुलभ करणारा, या भागातील पर्यटनास चालना देणारा आणि भविष्यात कोकणाला जोडण्यासाठी आणखी एका मार्ग तयार करणाऱ्या कोयनेवरील केबल पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. नव्या अत्याधुनिक स्थापत्य रचनेतून हा पूल बांधण्यात येत असून, लवकरच एक पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित केले जाणार आहे. या नव्या केबल पुलामुळे या भागाचे दळणवळण सुलभ होणार असून, पर्यटनास चालना मिळणार आहे. कोयनेवरील केबल पुलामुळे कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याला जोडले जाणार आहे.

कोयना धरणाच्या विशाल शिवसागर जलाशयावर केबल रचनेतून हा पूल साकारला जात आहे. पूर होत असलेला हा दुर्गम भाग शिवसागर जलाशयामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडणे कठीण होते. या पुलामुळे हे आता शक्य होणार आहे. सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वरजवळील पाटण तालुक्याचा भाग हा दुर्गम समजला जातो. सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍या, त्यातील घनदाट झाडी आणि याच भागात साकारलेल्या कोयना जलाशयामुळे हा संपूर्ण परिसर दुर्गम बनलेला आहे. कोयना जलाशयामुळे तर या भागातील दळणवळणावर मर्यादा येत होत्या. या भागातील अनेक गावांमधील ग्रामस्थांना संपूर्ण धरणाला वेढा घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागिरकांचे दळणवळण सुलभ करणे आणि या भागातील निसर्गाचा फायदा घेत पर्यटन वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने हा नवा केबल पूल अभारला जात आहे.

सातारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाबळेश्वर उपविभागाच्या वतीने टी. अँड टी. इन्फ्रा लि. या ठेकेदा कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे. अत्याधुनिक पद्धतीच्या या ‘केबल ब्रिज’चे काम सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री धरणाच्या पाण्यात कार्यरत आहे. तापोळा ते अहिर (ता. महाबळेश्वर) दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयावर या पुलाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने या पुलासाठी 175 कोटींची तरतूद केली आहे. या पुलाच्या बांधकामामुळे दुर्गम कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याला जोडले जाणार आहे. कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहीर हा रस्ता जोडला जाणार असून, यामुळे या भागातील अनेक गावांना जाण्यासाठी घालावा लागणारा मोठा वळसा कमी होणार आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि खर्चात बचत होणार आहे. हा पूल तयार झाला की पुढच्या टप्प्यात या मार्गानेच थेट रत्नागिरी जिल्ह्यातही उतरता येणे शक्य होणार आहे.