रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी (ता. 14) जिल्ह्यात सगळीकडेच मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली होती. सुट्टीमुळे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. तासभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. तर हापूस कलमांवरील मोहोर सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या औषध फवारण्यांवर पावसामुळे पाणी फेरले गेले.
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 16 नोव्हेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्याप्रमाणे गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता तर सकाळी सुर्यदर्शनच झाले नव्हते. दुपारी उन पडायला सुरवात झाली; मात्र सायंकाळी पुन्हा पावसाळी वातावरण होते. हलका वाराही वहायला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह विजाही चमकु लागल्या. भरुन आलेल्या आभाळातून पाणी टपकायला सुरु झाले. अचानक पाऊस पडायला लागल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. रत्नागिरी शहरासह गणपतीपुळे पर्यटनस्थळी फिरायला आलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करावी लागली. मंडणगड, दापोली, खेडसह चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वरमध्येही पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास सुमारे एक तास पावसाची जोर होता. निवळी-जयगड परिसरात तर मुसळधार पावसाने सर्वांनाच झोडपले. शहरातील मजगाव, शिळ, मिरजोळे पंचक्रोशीत जोरदार पडलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी होते. रत्नागिरी शहरात नवीन पाणी योजनेच्या वाहिन्या आणि भूमिगत गॅस वाहिनीसाठी ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. यातील माती रस्त्यावरच असल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामधून वाहने चालवणे नागरिकांना अशक्य झाले होते. तसेच काही रस्त्यांवरील खड्डे डांबरांने भरण्याचे काम सुरु आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये थंडी पडायला सुरवात झाली होती. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या हापूसच्या बागांना मोहोर येऊ लागला होता. तो किड रोगांपासून वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांनी किटकनाशकांची फवारणी केली; मात्र त्यावर मुसळधार पाऊस पडल्यामुळे झालेला खर्च वाया जाणार आहे. पावसाच्या पाण्याबरोबर औषध वाहून गेले असून बागायतदारांना सुरवातीला भुर्दर्ड बसणार आहे.