काजळी नदीतून उपसा केलेला गाळ पुन्हा नदीत; लाखोंचा खर्च पाण्यात

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर, काजरघाटी, चिंचखरी, गुरुमळी गावांमधून वाहणारी काजळी नदी गाळाने भरली आहे. गेल्यावर्षी चांदेराई येथे पूर येत असल्याने तेथील गाळ काढण्यात आला. मात्र यावर्षी तो पुन्हा नदीपात्रातच गेला. हाच गाळ वाहात येऊन सोमेश्वर, काजरघाटी, चिंचखरी येथे साचत असल्याने येथे ओहोटीच्यावेळी नदीतून चालत पलीकडे जाता येईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.

साखरपा (ता. संगमेश्वर) येथील काजळी नदीतील गाळ काढल्यानंतर तेथील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. चिपळूण तालुक्यात गेल्यावर्षी आलेल्या महापुरानंतर गेले आठ महिने गाळ काढण्याचे काम वेगाने करण्यात आले. त्यामुळे यावर्षी आत्तापर्यंत तरी चिपळुणात फार पाणी भरलेले नाही. यावर्षी पाऊस चांगला पडला असला तरी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात एकदाच पाऊस पडला. त्या दिवशीच फक्त पाणी भरले होते. परंतू गाळ काढल्यामुळे पाणी भरल्याने फारसे नुकसान झालेले नाही. अशाच प्रकारे काजरघाटी, सोमेश्वर, चिंचखरी येथील काजळी नदीतील गाळ काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्याने या नदीवर दोन्ही बाजूला आता दगडी संरक्षक बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. अर्धे काम पूर्ण झाल्याने खारे पाणी भातशेतीत घुसण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी गाळामुळे नदीपात्र उथळ झाले आहे. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी पाणी पात्राबाहेर पडते आणि शेतीत घुसते. त्यामुळे भातशेती, रब्बी पिकाचेही नुकसान होत आहे. गाळामुळे नदीपात्रात मोठी बेटे तयार होऊ लागली आहेत. नदीपात्र उथळ झाल्याने गणेश विसर्जनामध्येही अडचणी येत आहेत. खोल पाण्यात विसर्जनासाठी ग्रामस्थांना चालत जावे लागत आहेत. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने भातशेती, नारळ, कुळीथ, कडवे, पावटे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात येथे केला जातो. मात्र यापूर्वी खारे पाणी घुसल्याने येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. त्यानंतर आता बंधारा झाल्यामुळे शेतकरी पुन्हा भाताबरोबरच रब्बी पीक घेऊ लागले आहेत. मात्र नदी गाळाने भरल्यामुळे अतिवृष्टीमुळे पाणी भरून भातशेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी गाळ उपशाची मागणी केली आहे.