कळझोंडी येथे आंबा बागेत वणवा; तीन लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी डाळाचा पऱ्या येथील विद्युत तारांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीतून वणवा भडकल्याने येथील आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांच्या बागेतील ७५ कलमांना या वणव्याचा फटका बसला असून, होरपळलेल्या कलमांमुळे सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक वर्तवण्यात आला आहे. अंदाज

२१ मार्च रोजी सायंकाळी ३.३० वाजण्याच्या सुमारास डालाचा पऱ्या येथील आंबा बागेतून मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याचे लक्षात येताच शेजारी असलेले उद्योजक प्रकाश पवार यांच्या बागेतील रखवालदाराने प्रमोद पवार यांना तातडीने मोबाइलद्वारे खबर दिली. ही माहिती मिळताच उद्योजक युवक नेते प्रमोद पवार यांनी पाण्याची टाकी व वणवा आटोक्यात आणण्यासाठी कामगारांसह दाखल झाले. बागेला लालेला विझवण्यात त्यांना यश आले. या आगीमुळे आंबा बागायतदार दीपक सखाराम पवार यांचे सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा नुकसान झाले आहे.

या घटनेचा पंचनामा करण्यासाठी कळझोंडी गावच्या तलाठी स्नेहल लोंढे, सहकारी लिपिक दीपक वीर, गावचे सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

या पहाणीमध्ये कळझोंडी आर. के मुळये ते कळझोंडी जिल्हा परिषद धरण येथे वीज वितरण कंपनीची विद्युत वाहिनी गेली असून या विद्युत लाईनवर व उभ्या असलेल्या विद्युत खांबावर आजुबाजूच्या झाडांच्या फांद्या आलेल्या असून त्यामुळे या परिसरात अनेक वेळा विद्युत तारांचे घर्षण होऊन या परिसरात अनेकदा अचानकपणे वणवे जाण्याच्या प्रकारामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.