रत्नागिरी:- ढोल ताशांचा नाद सोबत लेझिमचा ताल.. फुलांची उधळण.. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करीत मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात गणरायाचे घरोघरी आगमन झाले. रत्नागिरीतील आंबेशेत, कर्ला गावातील प्रसिध्द मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. ही मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पडली.
मागील 38 वर्षापासून कर्ला-आंबेशेत गावातील घरगुती गणरायांची मिरवणूक वाजतगाजत शहरामधून गावापर्यंत काढण्यात येते. अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने शांततेत ही मिरवणूक मोहल्ल्यातून जात असल्याने या मिरवणुकीला विशेष महत्व आहे. या मिरवणुकीत जवळपास 120 गणेशमुर्ती होत्या. ढोल-ताशा पथकांसह, झांजपथक, कर्ला येथील गणराज मित्रमंडळाचे महिला लेझिम पथक, बेळगाव येथील बागलकोटचे बॅण्डपथक, शिवशक्ती चक्रीभजनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. सकाळी 9.30 वा. कर्ला-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूक समितीचे अध्यक्ष महेंद्र सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे, राजीव लिमये यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यात सहभागी झाली होती. जवळपास चार ते पाच तास ही मिरवणूक चालली.
शहरातील स्वा. सावरकर चौकातून सुरु झालेली ही मिरवणूक गोखले नाका, रामनाका मार्गे एसटी स्टॅण्ड, जयस्तंभ, शासकीय रुग्णालयमार्गे, निवखोल, कर्ला, आंबेशेत अशी काढण्यात आली.
माजी आमदार बाळ माने यांनी ढोल वाजवून मिरवणुकीत गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, माजी जि.प. अध्यक्ष उदय बने प्रांताधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, अप्पर तहसीलदार गीते, पोलीस निरीक्षक सनस व अधिकारी वर्गाने गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.