एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करा: डॉ. जाखड

रत्नागिरी:- कोवीडच्या प्रभावामुळे शाळा बंद होऊन विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणात अडथळा निर्माण झाल्याने मिशन झिरो ड्रॉपआऊट या विशेष शोध मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. ही मोहीम व्यापकस्तरावर राबवून एकही मूल शाळाबाहय राहणार नाही यासाठी सर्व यंत्रणेने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. इंदूराणी जाखड यांनी दिल्या आहेत.

या अभियानात ३ ते ६ वयोगटाची जबाबदारी महिला व बाल विकास अधिकारी आणि ६ ते १८ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे देण्यात आली आहे. शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. शाळाबाहय मुलांची शोधमोहिम यशस्वी होण्याकरिता तालुकास्तर, वॉर्डस्तर समिती, केंद्र व गावस्तर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिका-यांच्या सहभागाने शाळाबाहय व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल केले जाणार आहे. याबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोवीडच्या प्रादुर्भावामुळे ६ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाहय असल्याचे दिसून येत आहे. त्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी शोध मोहिम सुरु करण्यात येत आहे. मिशन झिरो ड्रॉप आऊटचे नियोजनाबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियान कालावधीत ६ ते १८ वयोगटातील मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यास संबधीत तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच ई-मेल वरही शाळाबाहय मुलांची माहिती देण्याची सुविधा आहे. जिल्हयातील सर्व मुले शाळेच्या नियमित प्रवाहात दाखल करुन एकही मूल शाळाबाहय राहणार नाहीत, असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. एन. बी. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी केल्या आहेत.