रत्नागिरी:- इंधन दरवाढीचा परिणाम भाज्यांवर होत असतानाच आता तीव्र उन्हामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली असून त्यांच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरातही प्रचंड वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरात इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला होता. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांच्या दरात वाढ केलेली पाहायला मिळाली. मात्र, आता उन्हाच्या तीव्र झळांमुळे पश्चिम महाराष्ट्रात लागवड होणाऱ्या भाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे चिपळूण, खेड, गुहागर येथील भाज्यांची आवक 50 ते 60 टक्क्यांनी घटली असून त्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून उन्हाच्या तीव्र झळांचा फटका हा भाजीपाल्याच्या पिकांवर पडत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक रोडावली असून त्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे भाजी विक्रेते राजू कांबळे यांनी सांगितले.
पालेभाज्याही महाग उन्हाच्या तीव्र झळांचा परिणाम हा भाजीपाल्याच्या पिकांवर होऊ लागला असून त्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. इतर भाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक 75 टक्क्यांनी घटली असल्याचे पालेभाजी विक्रेते सुधाकर पडवळ यांनी सांगितले. किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथिंबीर आणि शेपू या भाज्यांच्या दरात 8 ते 20 रुपयांनी वाढ झाली असून सध्या किरकोळ बाजारात 12 ते 50 रुपयांनी या भाज्यांची विक्री केली जात आहेत.