उक्षीतून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; एक गंभीर, दोघे जखमी

रत्नागिरी:- उक्षी घाटात मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला रविवारी (दि.19) अपघात होऊन 1 गंभीर तर 2 जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून गणपतीपुळे येथे पर्यटक दर्शनासाठी आले होते. रविवारी दिवसभर दर्शन आणि समुद्र सफरीचा आनंद घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सने मुंबईकडे निघाले होते. उक्षी घाटात ट्रॅव्हल्सचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवाशांना याची कल्पना दिली. ब्रेक निकामी झाल्याचे कळताच अनेकांनी गाडी बाहेर उड्या घेतल्या.

गाडीत 35 प्रवाशी होते. याचवेळी चालकाने प्रसंगावधान राखत डोंगर भागात गाडी घातल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा डाव्या बाजूला 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात शुभम कुंभारकर (वय २१, रा. पनवेल) हा गंभीर जखमी झाला आहे, तर 2 जण किरकोळ जखमी झाल्याचे समजत आहे. अपघातातील जखमींना उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर यांनी वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ९ रत्नागिरी सिव्हील येथे नेण्यात आले आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच उक्षी गावचे तंटामुक्त अध्यक्ष संदेश जोशी, पोलीस पाटील अनिल जाधव, उपसरपंच मिलिंद खानविलकर, मुझम्मील काझी, ताबिश राजापकर, आसिर हमदारे, रेहान खान, कृष्ण गोनबरे, गजानन पानगले, सुहास रावणंग, संतोष देवळेकर, महेश रावणंग, अमोल कांबळे, स्वप्नील जोशी, अझर गोलंदाज इत्यादी ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले.