जिल्हाभरात देव दिवाळी उत्साहात साजरी
रत्नागिरी:- कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरून बळी राजाचे ग्रामीण भागात आजही स्मरण केले जाते. रत्नागिरी जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात विडे भरण्याची परंपरा देवदिवाळीच्या दिवशी जपली जातेय या प्रत्यय आणून दिला जात आहे.
नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात.
नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठय़ातल्या बैलांना, गायीना दिला जातो. आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठा सारवायचा. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या. गोठय़ात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! स्वत: आधी दुसऱ्याचा विचार..जगाचा विचार.. विशेषत: आपल्या गुरा-ढोरांचा विचार शेतकऱ्यांशिवाय या जगात कोणी करत नसेल. देव दिवाळीला गुरांढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रित शिकवलेली आहे, अशी ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे.
देव दिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात हा विधी पार पडतो. या पंरपरेतही उर भरून येणारा अर्थ दडला आहे. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते. सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता. गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते. बळीराजा हाही एक आदर्श राजा होता, आज इतक्या वर्षानंतरही त्यांची आठवण काढली जातेय. ‘इडा टळो..पीडा टळो..माझ्या बळीचं राज्य येवो..‘या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आला.









