आशा, गटप्रवर्तक महिलांना माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेच्या सर्व्हेचा मोबदला तत्काळ मिळणार

रत्नागिरी:- माझी रत्नागिरी माझी जबाबदारी योजनेअंतर्गत केलेल्या सर्व्हेचा मोबदल्यासाठी येथील आशा व गटपवर्तक महिलांना गेली दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागलेली आहे. पण आता हा मोबदला किमान प्रत्येकी एक हजार रुपये जिल्ह्यातील 1350 आशा व गट प्रवर्तक महिलांना मिळणार याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आश्वासन दिले आहे.

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी ही मोहीम कोविड काळामध्ये एक मे 2021 ते 15 मे 2021 पर्यंत राबविण्यात आली. या पंधरा दिवसांमध्ये रत्नागिरी जिह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलां गटांनी 750 घरांना भेटी दिलेल्या आहेत. यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना ठरवून दिलेला मोबदला दोन वर्षे झाली तरीही अद्याप मिळालेला नाही. ही मोहीम रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांचे मार्फत सुरू करण्यात आलेली होती.

त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये चौकशी करून मोबदला रक्कम मागणी केली असता मागील दोन वर्षापासून या कामाचा मोबदला जिल्हाधिकारी यांचे मार्फत देणे आवश्यक असल्याचे जि.प. प्रशासन स्तरावरून असे सांगण्यात येत होते. म्हणूनच गुरूवारी 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनाबाबत बोलताना मोबदला का दिलेलं नाही याची माहिती घेण्यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन केला. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगितले की, आशा व गटप्रवर्तक महिलांची या योजनेची सर्व थकीत रक्कम ताबडतोब देणे आवश्यक आहे. तर त्याची तजवीज करावी असा आदेश त्यांनी दिला आहे.
सध्या रत्नागिरी जिह्यामध्ये 13500 इतक्या आशा व गटप्रवर्तक महिला आहेत. त्यांना माझी जबाबदारी माझी रत्नागिरी योजनेअंतर्गत काम केल्याबद्दल सरासरी प्रत्येकी एक हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. याबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्या भेटीप्रसंगी आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या सुमन पुजारी, वेदिका गडदे, जयश्री साठे, शंकर पुजारी व विशाल बडवे इत्यादींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.