आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 17 मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी:- आरटीई प्रवेश प्रक्रियेत जिल्ह्यातील 92 शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये विविध गटांसाठी जिल्ह्यातील 929 जागांवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 17 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरांवरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. जुलै ते नोव्हेंबर यादरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. मंडणगडातील 4 शाळांमधील 42 जागा, दापोलीत 15 शाळांमधील 91 जागा, खेडमधील 12 शाळांतील 191 जागा, चिपळूणातील 19 शाळांतील 204 जागा, गुहागरातील 5 शाळांमधील 25 जागा, संगमेश्वरातील 11 शाळांमधील 53 जागा, रत्नागिरीतील 20 शाळांमधील 277 जागा, लांजातील 3 शाळांमधील 16 जागा, राजापूरमधील 3 शाळांतील 30 जागा रिक्त आहेत.