आरटीई प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदत

रत्नागिरी:-  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (दि. 28) पहिली मुदतवाढ दिली. त्यानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे आता 1 ते 10 मार्चदरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यभरात 47 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यंदा राज्यातील 8 हजार 853 शाळांमधील 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाईन सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.