३७५ आरोग्य शिबिरे, २३,४०४ जणांची तपासणी
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे. ३७५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करून २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे ओपीडी अथवा आरोग्य शिबिरांमधून ८९६ मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व त्यातून १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी जागतिक तंबाखू नकार दिवसाच्या निमित्ताने ही माहिती समोर आली आहे.
सन २०१६-१७ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य स्तरावरुन ३४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जागतिक तंबाखू नकार दिवस दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा ३१ मे २०२५ रोजी जगभरात साजरा करण्यात आला.
यावेळी जागतिक तंबाखू नकार दिवसाची थीम आहे ‘आकर्षणाचा मुखवटा उतरवूया तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांमागील उदयोगांच्या क्लुप्त्या उघड करूया’ अशी होती. ज्याचा उद्देश तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांच्या जाहिरातीत वापरले जाणारे मोहक मुखवटे उतरवणे आणि लोकांना उदयोगांची फसवणूक करणारी घोरण उघडपणे समजावून सांगणे असा होता. त्या अनुषंगाने जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत ७२ हजार ७२८ लोकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडविण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आहे. ३७५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करून २३ हजार ४०४ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय येथे ओपीडी अथवा आरोग्य शिबिरांमधून ८९६ मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे व त्यातून १२६ मौखिक कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची कर्करोग तज्ञांद्वारे तपासणी करून उपचार करण्यात आले आहेत.
तोडांत कर्करोगजन्य काही लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे, जिल्हा, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या समुपदेशन केंद्र व १८००११२३५६ या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विकास कुमरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. यश प्रसादे, समुपदेशक प्राची भोसले, सामाजिक कार्यकर्ता सचिन भरणे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमा राबवण्यात येत आहे.
वर्षभरात १ हजार ७८६ जणांवर दंडात्मक कारवाई
तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था उपक्रम राबवणे आणि कोटपा कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कलम ४ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी अन्वये १७८६ लोकांवर २०९३८० रु. ची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर रत्नागिरी हा धूरमुक्त गाव, शहर, जिल्हा करण्यासाठी तालुकास्तरीय व गावस्तरीय अभियान राबवण्यात येत आहे. परंतु यासाठी नागरिकांनीदेखील पुढाकार घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम ओळखून व्यसनांपासून लांच राहिले पाहिजे.









