आंबा घाटात दरीत ट्रक कोसळला; नशीब बलवत्तर म्हणून चालक बचावला

 देवरूख:-रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा येथे ट्रक सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातातून चालकाचे नशीब बलवत्तर असल्याने तो बालंबाल बचावला आहे. तो जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. तर ट्रकचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. 

याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धिरज जगन्नाथ गाडेकर (वय-३३, रा. करवीर, जि. कोल्हापुर) असे या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणि बालंबाल बचावलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. धिरज आपल्या ताब्यातील (MH09/CA-1491) या ट्रकमध्ये साखरेची पोती भरून हा ट्रक कोल्हापूरहून जयगडकडे घेवून येत होता. ट्रक कळकदरा येथे आला असता ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत जावून कोसळला. याचवेळी ट्रकचालक धिरज याने जीव वाचवण्यासाठी ट्रकबाहेर उडी मारली. उडी मारल्याने तो गडगडत खाली गेला. मात्र दरीत झाडे असल्याने एका ठिकाणी त्याला झाडाचा आधार मिळाला. मात्र या अपघातात तो जखमी झाला आहे. 

 दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पो. काँ. तानाजी पाटील यांनी होमगार्ड मंगेश शिंदे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरीत अडकलेल्या चालक धिरज गाडेकर याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इतर वाहनचालकांना मदतीला घेवून दोरीच्या सहाय्याने जखमी धिरजला दरीबाहेर काढण्यात आले. व अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातग्रस्त ट्रकमधून साखरेची पोती जयगडकडे नेण्यात येत होती. याची किंमत सुमारे १० लाख रूपये इतकी आहे. अपघात घडल्यानंतर साखरेची पोती ट्रकबाहेर पडून अस्ताव्यस्त पडली होती. काही पोती फुटलीदेखील होती. त्यामुळे साखरेचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे या भीषण अपघातात ट्रकचा अक्षरशः चक्काचुर झाल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हे. काँ. राहूल गायकवाड करीत आहेत.