रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सव्वातिनशे शिक्षकांनी पोर्टलवर अर्ज भरले आहेत. बदलीसाठी अर्ज भरण्याची मंगळवारी (ता. ९) अंतिम तारीख होती. १३ तारखेपर्यंत बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण करण्यात आले आहे. तांत्रिक कारणासह अन्य कारणास्तव ही प्रणाली कार्यरत होण्यासाठी काही विलंब झाला होता. गेल्या काही दिवसात पुन्हा ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुकांनी ९ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावयाचे होते. त्यानंतर पुढील चार दिवसात बदलीचे आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत. परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीसाठी आलेल्या शिक्षकांची संख्या अधिक आहे. दरवर्षी शेकडो अर्ज शिक्षण विभागाकडे येतात. तिन ते पाच वर्षे झालेल्यांना आंतरजिल्हा बदलीने जाण्यास अर्ज करण्याची संधी मिळते. शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दहा टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यामुळे अनेक शिक्षकांची गावाकडे जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. इच्छुक शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरुन ठेवण्यासाठी शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत परजिल्ह्यात जाण्यासाठी सव्वातिनशे शिक्षकांनी ऑनलाईन प्रस्ताव केले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सध्या शिक्षकांची रिक्त पदे १७ टक्केपेक्षा अधिक आहेत. नव्याने भरतीही केली गेलेली नाही. या परिस्थितीत आंतरजिल्हा बदलीने पात्र शिक्षकांना सोडण्यात आले तर रिक्त पदांमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, बदलीसाठी शिक्षक पात्र ठरले तरीही त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात मराठी माध्यमातील प्राथमिक शिक्षकांची मंजूर पदे ६ हजार ६८९ आहेत. त्यातील ५ हजार ७८५ पदे भरलेली आहेत. त्यातील ९०४ पदे रिक्त आहेत. उर्दु माध्यमाची ४७० पैकी ३९० पदे भरलेली आहेत. दोन्ही मिळून ९८४ पदे रिक्त आहेत.