राष्ट्रीय खो-खो स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ विजयी
रत्नागिरी:- उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय पुरुष, महिला खो-खो स्पर्धेतील साखळी सामन्यात महिला गटात महाराष्ट्र संघाने अरुणाचल प्रदेशवर तर पुरुषांनी उत्तराखंडवर मात केली. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणार्या अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे यांनी चमकदार कामगिरी करत विजयात मोलाची भुमिका बजावली.
भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहेत. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (५ गुण), स्नेहल जाधव (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), प्रतीक्षा बिराजदार (२:४० मि. संरक्षण), प्रीती काळे व श्रेया सनगरे (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (४ गुण), दिपाली राठोड (३ गुण), अपेक्षा सुतार व पूजा फरगटे (प्रत्येक २ गुण) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय मिळवणे सहज शक्य झाले. पराभूत अरुणाचल प्रदेशच्या प्रेमाने थोडीफार चांगली कामगिरी केली. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर १७-७ असा १:१० हि. राखून डावाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप व प्रतीक वाईकर (प्रत्येकी २:४० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय मासाळ (२:१० मि. व ३ गुण), लक्ष्मण गवस (२:१० मि. संरक्षण व २ गुण), सुरज शिंदे (२:२० मि. संरक्षण) व गजानन शेंगाळ (३ गुण) यांनी आपल्या शानदार खेळाची झलक दाखवताना महाराष्ट्राला डावाने विजय मिळवून दिला. पराभूत उत्तराखंडच्या शशिकांतने एकहाती लढत दिली.
महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा १८-४ असा एक डाव १४ गुणांनी धुवा उडवला. गोव्याच्या काशी गांवकरने ४:२० म. संरक्षण व ३ गुण, अश्विनी वेळीपने ४:३० मि. व २ गुण, दीप्ती वेळीपने नाबाद ४:३० मि. संरक्षण करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सीमा सुरक्षा बलच्या अश्विनी चव्हाणने एकाकी लढत दिली.
पुरुषांच्या सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरचा २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला. अक्षय उमाते, दिलराजसिंग सेनगर, राज सिसोदिया त्यांनी चांगला खेळ केला तर जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही खेळाडूला विशेष प्रभाव पडता आला नाही.
कोल्हापूरच्या महिलांनी सुद्धा जम्मू काश्मीर वर ३२-६ असा एक डाव २६ गुणांनी धुवा उडवला व पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूरने त्रिपुराचा २८-८ असा एक डाव २० गुणांनी पराभव केला.









