अनंत चतुर्थीच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज; 33 हजार 500 मूर्त्यांचे विसर्जन 

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या….च्या जयघोषात शुक्रवारी (ता. ९) अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. जिल्ह्यातील ३३ हजार ५०० घरगुती आणि ६२ सार्वजनिक गणपती मुर्तींचे विसर्जन समुद्र किनारे, नद्या-नाल्यात उत्साहात होईल. विसर्जनावेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर सुचना देण्यात आल्या असून समुद्रकिनारी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोकणातील गणेशोत्सवाला ३१ सप्टेंबरला सुरवात झाली. दिड लाखाहून अधिक घरगुती गणपतींची उत्साहात प्रतिष्ठापना झाली. पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. कोरोनाची बंधने नसल्यामुळे दीड लाखाहून अधिक चाकरमानी उत्सवासाठी कोकणात उतरले होते. आरत्या, भजने यासह पारंपरिक पध्दतीने या उत्सवाचा आनंद गावागावांमध्ये सुरु होता. दीड दिवस, पाच दिवसांनी गौरी-गणपती विसर्जन झाले. वामन द्वादशीला काही गणपतींना निरोप दिला. काही गावांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस पुजा-अर्चा केल्यानंतर उद्या भक्तीभावाने गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विसर्जन मिरवणुकांचे नियोजन केले जाते. रत्नागिरी शहर आणि परिसरात अनेक मंडळे ढोल-ताशांसह बेंजोच्या सुरावर ताल धरत मिरवणुका काढतात. शहरातील बहूसंख्य गणपतींचे विसर्जन मांडवी किनारी होते. या परिसरात गणपतीच्या मुर्ती नेणार्‍या गाड्यांव्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतुक कोंडी होऊन मिरवणुकांमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडुन काळजी घेतली जाते. मांडवी, भाट्ये किनारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेकडून किनारी भागात कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच पालिकेची गाडी आणि कर्मचारी तिथे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील ३३,५०० अनंत चतुर्दशीला घरगुती गणेशाला निरोप देणार आहेत. त्यात रत्नागिरी शहर ११७९, ग्रामीण १५४६, जयगड ६६३, संगमेश्वर ३४४१, राजापूर ६११८, नाटे ६१५, देवरूख ११३५, सावर्डे ७७८, चिपळूण ३९८६, गुहागर ४३५०, खेड २११३, अलोरे १००, मंडणगड १७६, पुर्णगड ९६९, दाभोळे १७९ याचा समावेश आहे.

मिरवणुकांवर पावसाचे सावट

हवामान विभागाने पुढील तिन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसाची शक्यता असून पुर्वसंध्येला रत्नागिरीत हलका पाऊस झाला आहे. पावसाचे सावट असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी गणेशभक्तांना मिरवणुकांचे नियोजन करावे लागणार आहे.