रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन स्त्री परिचर यांनी विविध मागण्यांसाठी २२ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात ३५० महिला या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबतचे निवेदन शुक्रवारी (ता. १७) जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
गेली काही वर्षे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी या महिला आंदोलन करत आहेत. आता पुन्हा एल्गार केला आहे. २२ डिसेंबरपासून कामबंद आंदोलनाबरोबरच मुंबई विधि मंडळावर बेमुदत धरणे सत्याग्रह आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे, मोहिनी पवार, ज्योती सावंत, मंगला पवार आदी उपस्थित होत्या. महिला परिचरांना नियमित सेवेत घ्यावे, गरजेवर आधारित किमान वेतन रूपये १८ हजार मासिक मिळावेत, कोविड लसीकरण सत्राचे परिश्रमिक मिळावेत, शस्त्रक्रिया शिबिरात रात्रपाळी लावणे बंद करणे, गृहभेटीसाठी प्रवास खर्च मिळावा, अपघात विमा लागू करावा, गणवेश ओळखपत्र मिळावे आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.