अंमली पदार्थ विक्री विरोधात पालकमंत्री आक्रमक

मुळावर घाव घाला; स्वतंत्र पथक नेमा: ना.उदय सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे बदबाद होत आहे. या विरोधात ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे. येत्या ३ महिन्यांमध्ये अंमली पदार्थाविरोधी कोणतीही तडजोड न करता कठोर आणि प्रभावी मोहिम राबवून जिल्ह्यातून अंमलीपदार्थाचे समुळ उच्चाटन करा. याच्या मुळावर घाव घाला आणि अंमला पदार्थ वितरकाच्या संपर्कात असणार्‍या सर्वांवर गुन्हे दाखल करा. यामध्ये जर कोणत्या राजकीय पुढाऱ्याने हस्तक्षेप करण्यासाठी फोन केला तर त्याच्या नावाचा पोलिस डायरीमध्ये उल्लेख करा. परतुं राज्यात जिल्हा अंमलीपदार्थ मुक्त करण्याचा मान जिल्हा पोलिस दलाने मिळवावा, असे आवाहन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही, नियंत्रण व जनजागृतीबाबत शनिवारी आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, श्री. यादव यांच्यासह प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अंमली पदार्थाचा थेट परिणाम युवा पिढीवर होत आहे. हे प्रत्येक गावाचे दु:ख आहे. ग्रामीण भागातील युवक मृत्युमुखी पडत आहेत. पोलिस चांगले काम करीत असले तरी या सामाजिक मोहिमेत माध्यमांनीही त्यांना सहकार्य करावे. अंमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी. कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाहीत. आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत, हे दिसून येते. राज्यात अंमली पदार्थ मुक्त आपला रत्नागिरी जिल्हा करु. अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल, अशा पध्दतीने ही मोहीम तीवÏ राबवावी.

माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍याबरोबर विक्री करणाराही तेवढाच दोषी आहे. अंमली पदार्थ विक्रेता आणि त्याचे सेवन करणारा या दोघांवरही सारखीच कारवाई होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थीनी, तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवन करु नये. त्याची विक्री करणारे तसेच वापर करणारे यांच्याविषयीची माहिती जर, कोणाला असेल तर त्यांची नावे पोलीसांना कळवावीत. कळवणार्‍याची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

आता नो कॉम्प्रोमाईझ

अंमली पदार्थाचे हे लोण कधी तरी आपल्या घरातही पोहचेल. याचे भान पोलिसांसह सर्वांनी ठेवावे. त्यामुळे अंमली पदार्थाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे नो कॉम्प्रोमाईझ, अशी कठोर भूमिका घ्यावी. अशा आरोपींना पाठीशी घालणारे जर कुणाचेही फोन आले, तर त्याबाबतीत पोलीसांनी धाडस दाखवावे व तशी डायरीला नोंद घ्यावी. अशांची नावे प्रसिध्दी माध्यमांना द्यावीत. पोलिसांनी मनावर घेतल्यानंतर ते कशा पध्दतीने कारवाई करु शकतात, हे या मोहिमेत पोलिसांनी जनतेला दाखवून द्यावे, असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.