विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रत्नागिरीत प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.

​मयत महिलेचे नाव मेनका युवराज चव्हाण (वय ३२, रा. साळवी स्टॉप, गुडलक बेकरीसमोर, रत्नागिरी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मेनका यांचे पती रात्री उशिरा घरी आले होते. त्यावेळी पतीसोबत मद्यप्राशन केलेले असताना मेनका यांनी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले.

​विषबाधा झाल्याचे लक्षात येताच त्यांचे पती युवराज चव्हाण यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे हलवण्याचा सल्ला दिला. कोल्हापुरात उपचार सुरू असतानाच १२ एप्रिल रोजी सकाळी ७:४५ वाजण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

​या घटनेबाबत १६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी बी.एन.एस.एस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (ए.डी. नं. ४३/२०२६) नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.