विषप्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील घटना

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील दिवटेवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. अजित वसंत शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून, रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

​मिळालेल्या माहितीनुसार, अजित शिंदे हे अचानक फिट येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

​उपचार सुरू असताना, अजित शिंदे यांच्या तोंडातून आणि उलट्यातून येणाऱ्या उग्र वासावरून त्यांनी कोणतेतरी विषारी औषध प्यायल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. नातेवाईकांनी तातडीने घरी जाऊन शोध घेतला असता, घराच्या बाजूला एक विषारी औषधाची रिकामी बाटली आढळून आली. ही बाटली डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्या दिशेने उपचार सुरू करण्यात आले.

​डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विष पसरल्याने उपचाराला यश आले नाही. अखेर १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे डॉ. आकाश यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

​या घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजित शिंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राजापूर आणि रत्नागिरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत