मुदतीत बाबींची पूर्तता न केल्यास नोंदणी होणार रद्द, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
रत्नागिरी:- राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना अधिसूचना जारी करत सर्वाना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या रुग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवासांच्या आत म्हणजेच फेब्रुवारीपूर्वीच दिलेल्या सूचनांची पूर्तता करावी. जर तपासणीत त्रुटी आढळून आल्यास त्या रुग्णालयांचे, दवाखान्याची नोंद रद्द करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाच्या कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शहरातील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश खासगी रुग्णालये व दवाखाने याचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याबाबत अधिसूचना जारी करत सर्व खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही या रुग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतलेली नाही. लवकरच याबाबत आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयात उपचाराचे दर हे एकसमान नसून जो तो आपापल्यापद्धतीने शुल्क आकारत असतो. त्यामुळे अनेकवेळा रुग्णाला उपचाराच्या शुल्काची माहिती नसते. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकाला जेव्हा बिल दिले जाते, त्यावेळी अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने त्याची भंबेरी उडते. अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकाला या ठिकाणी इतका खर्च येणार आहे, हे आधीच माहिती असल्यास रुग्णाला त्या रुग्णालयात दाखल करायचे की नाही, याचा निर्णय घेणे शक्य होते.
आरोग्य विभाग कायद्यानुसार नोंदणी करून घेत असतो. तसेच त्याच्या अंमलबजावणीचे काम पाहत असतो. दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसेच रुग्ण हक्क संहिता देण्यात आली आहे. त्यामधील नियमांनुसार रुग्णालयात पुरवण्यात येणाऱ्या सेवा, उपचार, त्यासाठी आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर सविस्तर दर्शवणारे दरपत्रक छापील स्वरूपात शुश्रूषागृहाच्या दर्शनी भागात ठळकपणे लावावे. जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच नागरिकांना कोणत्या आरोग्य सुविधा भेटणार याची महिती मिळेल. तसेच प्रत्येक रुग्णालयांनी वेळोवेळी यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट करून घेणेही बंधनकारक आहे. जेवढे रुग्णालयात डॉक्टर असतील किंवा बाहेरून येणारे डॉक्टर असतील त्यांचे नुतनीकरण झाले की नाही, हे देखील पहावे. तसे नसल्यास त्या डॉक्टरांना बोगस डॉक्टर म्हणून संबोधले जाऊ शकते. त्रुटी आढळल्यास कारवाई क्रमप्राप्त जिल्हयातील सर्व रुग्णालये, दवाखाने यांनी खबरदारी घेत जानेवारी महिना संपायच्या आत सर्व बाबींची पूर्तता करावी. अन्यथा फेब्रुवारीपासून सुरू केल्या जाणाऱ्या तपासणीत त्रुटी आढळल्यास कारवाई करणे क्रमप्राप्त ठरणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले आहे.