रत्नागिरी:- राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निष्काळजीपणा झाला, त्यामुळे एक जागा गमवावी लागली. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होणार नाही, तसेच राज्यसभा निवडणुकीत गणितं कोणी जुळवली हे अख्ख्या देशाने पाहिलं आहे. त्यामुळे विधान परिषद निडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा जिंकेल असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यसभेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने गणितं जुळली होती, यापेक्षा कुणी जुळवली हे अख्ख्या देशाने बघितलं आहे. विधानपरिषदेची निवडणूक दि. २० जूनला होते आहे. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून सचिन अहीर आणि श्री.पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. आमचे दोन्ही सदस्य विधान परिषदेत जातील. महाविकासआघाडीकडून राज्यसभा निवडणुकीत जो निष्काळजीपणा झाला त्याची पुनरावृत्ती होणार नाही. आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास ना.उदय सामंत यांनी व्यक्त केला.
पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा दौर्यावरून टीका करणार्या भाजपा आमदार नितेश राणे यांनाही उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी नितेश राणेंचं नाव न घेता टोला लगावला. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे घाबरणार नाही, उलट ते दौरा यशस्वी करून परत येतील, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. बहुसंख्य ग्रामस्थ रिफायनरी पाहिजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल तर मुख्यमंत्री या प्रकल्पाचा विचार करतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.









