Tuesday, August 25, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जि. प.ची इमारत निधीअभावी रखडली

रत्नागिरी जि. प.ची इमारत निधीअभावी रखडली

काम मार्चपासून ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आर्थिक तरतुदीअभावी अडचणीत आली आहे. सुमारे ४४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या इमारतीचे काम मार्च महिन्यापासून ठप्प झाले आहे. मूळ मंजूर काम पूर्ण करण्यासाठीच आणखी सुमारे १० कोटी रुपयांची गरज असून, निधी उपलब्ध न झाल्याने ठेकेदाराने काम बंद केले आहे.

विशेष म्हणजे, ४४ कोटींच्या मूळ बांधकामासाठी निधीची अडचण असतानाच आता इमारतीतील फर्निचर आणि इलेक्ट्रिकल कामांसाठी आणखी सुमारे २० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावालाही अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे एकीकडे इमारतीचे मूळ बांधकाम निधीअभावी रखडले आहे, तर दुसरीकडे फर्निचर आणि विद्युत कामांसाठी स्वतंत्र मोठ्या निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. ४४ कोटींचे काम पूर्ण होण्यापूर्वीच आणखी २० कोटींच्या प्रस्तावामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मार्चपासून काम बंद असल्याने इमारत कधी पूर्ण होणार, उर्वरित १० कोटींचा निधी कधी मिळणार आणि २० कोटींच्या अतिरिक्त प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता कधी मिळणार, याकडे आता जिल्हा परिषद प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. निधीअभावी कोट्यवधींची प्रशासकीय इमारत रखडल्याने शासनाकडून आता ठोस आर्थिक तरतूद होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.