चौघे न्यायालयीन कोठडीत
चिपळूण:- अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांना संगनमताने दमदाटी करणे, मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि पैशांची मागणी करून मानसिक दबावाखाली आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात सध्या गायब असलेल्या धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत या दोघांचा अलोरे-शिरगाव पोलिसांकडून अत्यंत कसून शोध घेतला जात आहे. या दोघांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आपली विशेष पथके सज्ज केली असून सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
या प्रकरणात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल असून, त्यापैकी अटक करण्यात आलेल्या अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे या चौघांना मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या खळबळजनक प्रकरणाची पाळेमुळे मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या पत्रात दडलेली आहेत. या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूला हे सहा जणच जबाबदार असल्याचे लिहून ठेवले होते, ज्याच्या आधारे मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार जणांना ताब्यात घेऊन सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी ही मुदत संपताच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, आता पोलीस यंत्रणेचे पूर्ण लक्ष या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार समजल्या जाणाऱ्या उर्वरित फरार दोघांना बेड्या ठोकण्यावर केंद्रित झाले आहे.









