पोस्टमनने दीड वर्षात टपालच वितरीत केले नाही

घरी आढळली २ पोतडी भरलेली टपाले

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेली दीड वर्षे पोस्टात आलेली टपालेच पोस्टमनने वितरीत केली नसल्याची घटना पोस्टमास्तराने केलेल्या पाठपुराव्यामध्ये उघडकीस आली आहे. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रूजू झालेल्या पोस्ट मास्तराने केलेल्या पाठपुराव्यामध्ये सदर प्रकार उघडकीस आला आहे.

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करण थोरात नामक पोस्टमन आहे. येथील ग्रामस्थांकडून आपल्यासाठी आलेली टपाले मोबाईलवर ट्रॅकींग रिपोर्ट आला असताना आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत म्हणून वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात विचारणा सुरू केली. अशामध्ये वेळणेश्वर पोस्ट ऑफिसमध्ये नव्याने रूजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी पोस्टमन करन थोरात याच्याकडे विचारणा सुरू केली.मात्र त्यावर पोस्टमन काहीच उत्तर देत नव्हता. अखेर पोस्टमनच्या घरी जाऊन पाहाणी करण्याचा प्रयत्न केला असता पोस्टमनच्या घरी दोन पोतडी भरलेली टपाले आढळून आली. ज्यामध्ये अनेकांचे बँकांची लिलाव नोटीस, पासबुके, चेकबुक, आधारकार्ड, एटीएम कार्ड, एलआयसी सर्टीफिकेट, तलाठी यांच्यासाठी सन २०२४ मध्ये आलेली पत्रे, हायस्कुल यांना मुंबई विद्यापीठातून आलेली पत्र, काँलेजची पत्रे, मोजणीची नोटीस आदी तब्बल दिड वर्षापेक्षा जास्त कालावधीमधील टपाले मिळून आली.

दरम्यान सदर प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून, पोस्ट इंस्पेक्टर हिमांशू जोशी यांनीही सदर घटनेची पहाणी केली आहे. तर जिल्हा कार्यालयातुनही अधिकारी वर्ग शनिवारी सकाळी १० वाजता वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी उपस्थित रहाणार आहेत.

लोकांचे नुकसान कोण भरून देणार ?

वेळणेश्हवर येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी वेळणेश्वर पोस्ट कार्यालयाला भेट दिली. मोजणीची नोटीसा येऊनही लगतदाराला वेळीच न पोहचल्याने दोन ते तीन वेळा मोजणीसाठी फी भरावी लागली. अनेकांची दागिन्यांच्या लिलावाच्या नोटीसा येऊनही त्यांना नोटीसा न मिळाल्याने काहींचे दागीन्यांचे लिलाव झाले. आधारकार्ड व पॅनकार्ड न मिळाल्याने अनेकांची काम खोळंबली आहेत. यामुळे याची मोठ्या प्रमाणात नुकसान भरून कोण देणार असा सवाल ग्रामस्थांनी केला.