38 लाखाचा प्रस्ताव ; गळक्या खोल्यांची दुरुस्ती
रत्नागिरी:- म्हाडा किंवा शासनाकडून जिल्हा पोलिसांना हक्काची घरे मिळतील तेव्हा मिळतील; मात्र दयनीय अवस्था झालेल्या पोलिस दलाच्या वरचा फगरवठार येथील 6 चाळी दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस दलाने घेतला आहे. त्या संदर्भातील सुमारे 38 लाखाचा प्रस्ताव पोलिस दलाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यातून 62 खोल्यांची दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनमधून निधी मिळाल्यास यंदाच्या पावसात पोलिस कर्मचार्यांना गळक्या खोल्यांमध्ये राहण्याची वेळ येणार नाही.
पोलिसांच्या चाळींचा विषय माकडाच्या घरासारखा झाला आहे. पावसाळा आला की घराची आठवण होते. दरवर्षी नवीन हक्काची घरे बांधली जाणार असल्याची अनेक आश्वासने मिळतात, मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. पोलिसांचा सुमारे 100 कोटीचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याची घोषणा यापूर्वी तत्कालीन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली होती; मात्र त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आली तेव्हा म्हाडा हा प्रकल्प उभारून झालेला खर्च शासनाकडून घेण्याचा निर्णय झाला. तेव्हाही ज्या जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार होता ती जागा महसूल विभागाची असल्याने अडचण झाली. त्यामुळे हा प्रकल्प मागेच पडला. शहरातील वरचा फगरवठार येथे पोलिसांच्या सहा चाळी आहेत. त्यामध्ये 62 खोल्या आहेत; मात्र त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. खोल्यांचे, खिडक्यांचे दरवाजे कुजले आहेत. छप्पर पावसाळ्यात गळत असल्याने ताडपत्री बांधून पोलिस कर्मचार्यांना राहावे लागते. 24 तास ड्यूटी करून कर्मचार्यांना हा मनस्ताप सहन करावा लागतो.
दुरुस्तीला तुटपुंजा निधी पोलीस राहात असलेल्या खोल्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती होते; मात्र शासनाकडून येणारा निधी जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतीसाठी असतो. त्यामुळे या चाळींच्या दुरुस्तीला तुटपुंजा निधी मिळतो आणि महत्वाची दुरुस्ती तशीच राहते. परिणामी, पावसाळ्यात चाळीतील पोलिस कर्मचार्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.









