रत्नागिरी:- एक गाव एक गणपती प्रथा गणपतीपुळे आणि परिसरातील चार गावांमध्ये गेली पाचशे वर्षे पाळली जात आहे. यंदा कोविड 19 चा प्रादुर्भावामुळे या प्रथेत खंड पडला आहे. गणेशभक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करणे अशक्य असल्यामुळे परंपरेप्रमाणे श्री गणरायाच्या चरणाचे तिर्थ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरु आहेत. भक्तगणांना मनोमनी श्रींची आराधना करावी लागणार आहे. तसेच भक्तांसाठी देवस्थानतर्फे ऑनलाईन लाईव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे गणपतीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. गावाच्या एकोप्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ अशी संस्कृती राबवण्याचा प्रयत्न गेली 500 वर्ष सुरु आहे. मालगुंड, निवेंडी, गणपतीपुळे, नेवरे या परिसरातील ग्रामस्थ भाद्रपद मधील गणेश चतुर्थीला घरात गणपती आणत नाहीत. गेले कित्येक पिढ्या ही परंपरा सुरू आहे. कोकणात गणेशोत्सवा घरोघरी गणपती आणून त्याची मनोभावे पुजा-अर्चा करतात. त्या गावांमध्ये घरात नैवेद्य तयार करुन तो गणपतीपुळ्याच्या देवळात नेऊन दाखवला जातो. तेथील तिर्थ घरी आणून त्याची पुजा केली जाते. यंदा त्यावर कोरोनाचे सावट आले आहे. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याने 22 मार्चपासून टाळेबंदी केली गेली. गर्दीमुळे संसर्ग टाळण्यासाठी पर्यटनस्थळे, मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली. अजुनही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. समुह संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून येतो. गणपतीपुळेत गेली पाचशे वर्षे सुरु असलेली एक गाव एक गणपती ही संकल्पना यंदा खंडित होणार आहे.गावातील लोकं घरात गणपती न आणता मंदिरात जाऊन दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर मंदिरातील तिर्थ घरी नेऊन त्याचे पुढे पाच दिवस पुजन केले जाते. ही प्रथा गणपतीपुळेमध्ये कायम आहे. कोरोनामुळे मंदिरच बंद ठेवण्याचे केंद्र शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे या प्रथेत अडचणी निर्माण होत आहेत. दर्शनासाठी मंदिर उघडणे अशक्य असल्यामुळे त्यातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न गणपतीपुळे मंदिर कमिटीकडून सुरु आहे. यासंदर्भात जिल्हाप्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 21) सायंकाळी याविषयावर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी चर्चा झाली होती. मंदिर प्रशासनातर्फे प्रथेविषयी माहिती देण्यात आली. प्रथा, परंपरा कायम ठेवण्यासाठी गणपती मंदिरातून पुजा केलेले तिर्थ गावातील पाच लोकांना दिले जाईल. ती पाच लोकं परंपरेचे जतन करणार्या लोकांना श्री गणरायाचे तिर्थ घराघरात वितरीत करतील. या माध्यमातून कोरोना कालावधीतही परंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत सायंकाळी उशिरा निर्णय होणार आहे.
मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. ती उघडण्याची परवानगी जिल्हाधिकारी देऊ शकत नाही. गणेशोत्सवाची प्रथा मोडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून पाच लोकांना तिर्थ देण्याची व्यवस्था करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
– डॉ. विवेक भिडे, देवस्थान सरपंच
चौकट
गणेश चतुर्थीला हजारो भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी गणपतीपुळे येतात. त्यांच्यासाठीही देवस्थानतर्फे ऑनलाईन लाईव्ह दर्शन देण्याची व्यवस्था केली आहे.http://www.ganpatipule.co.in/ ऑनलाईन या लिंकवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. अतिपावसामुळे त्यात खंड पडण्याची शक्यता असते; परंतु भक्तगणांना त्याचा लाभ घेता येणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.