Tuesday, May 12, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाणीज येथे भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर

नाणीज येथे भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील नाणीज येथील जुन्या मठाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सायंकाळी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.प्रकाश शांताराम कांबळे (वय ४५, रा. दाभोळे बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळ परिसरातून रत्नागिरीकडे जाणारी रिक्षा (एमएच-०८ एक्यू ८८६६) महामार्गावरून जात असताना समोर असलेल्या ट्रॅक्टरने अचानक ब्रेक लावले. ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने चालकाने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मागून भरधाव येणारी रिक्षा थेट ट्रॅक्टरवर आदळली.

धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना मोफत रुग्णवाहिका सेवेमार्फत तातडीने पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर हा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पाली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन कांबळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.