राजापूर:- रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजापूर येथील एका ४२ वर्षीय तरुणाचा सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमृत अनंत तांबडे (वय ४२, रा. वरची पेठ, राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास अमृत तांबडे हे आपल्या मोटारसायकलवरून राजापूर गावातून जात होते. यावेळी त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर (डिव्हायडर) जोरात धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर त्यांना तातडीने राजापूर येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करून राजापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दि. २३ एप्रिल रोजी सांगलीतील भारती हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. त्यांचे भाऊ सत्यवान भिकाजी तांबडे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच, दुर्दैवाने दि. २५ एप्रिल रोजी सकाळी ०९.३३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत भारती हॉस्पिटलच्या डॉ. विजया जाधव यांनी माहिती दिल्यानंतर, सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (आमृ) क्रमांक २८/२०२६, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणाची कागदपत्रे प्राप्त केली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.









