जिल्ह्यात लॉकडॉऊनसाठी एक दिवस वाढवला; 3 जूनपासून कडक नियमावली लागू 

रत्नागिरी:- जिल्ह्यात आठवडाभराच्या लॉकडॉऊनपूर्वी आणखी एक दिवस प्रशासनाने वाढवून दिला आहे. आता 2 जून ऐवजी 3 जून पासून कडक लॉकडॉऊन केला जाणार आहे. लॉकडॉऊनपुर्वी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

3 जून पासून होणाऱ्या लॉकडॉऊनमध्ये शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना वाहतुकीची परवानगी दिली जाईल. या काळात किराणा, भाजीपाला विक्री, चिकन, मटण शॉप्स, मच्छी मार्केट, आदींसह सर्व आस्थापना बंद राहतील. जिल्ह्यातील 30 ते 40 टक्के उद्योग व्यवसाय बंद राहतील. पावसाळ्यात शेतक-यांना पैशाची गरज असते. त्यामुळे बँका, वित्तीय संस्थांमध्ये केवळ कृषी विषयक सेवाच सुरु राहतील. उर्वरित सर्व सेवा बंद राहतील. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज रोजी झूम प्रणालीवरुन पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी ते बोलत होते.

3 जून ते 9 जून या कालावधीत सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार पूर्णत: बंद राहतील. पार्सल सेवा ही बंद राहिल. मेडिकल दुकानांमध्ये औषधांव्यतिरीक्त ग्रोसरी किंवा अन्य साहित्य विक्री होते. त्याला ही बंदी राहणार नाही. तसे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई केली जाईल. पेट्रोल पंपांमध्ये अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल, डिझेल मिळेल. पेट्रोल पंप सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरु राहतील. कृषी विषयक दुकाने, खते, कीटकनाशके विक्री दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेतच सुरु राहतील. अवजारांची दुकाने बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. चिपळूण, खेड, रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर कोरोना टेस्टिंग सुरु राहिल. मान्सून पूर्व सुरु असलेली सर्व शासकीय कामे सुरु राहतील. ज्या गावांमड्ये लग्न असतील. त्याठिकाणी 1 पोलिस कॉन्स्टेबल, 1 व्हीडीओ ग्राफर, तलाठी आदी असतील. तसेच लग्न समारंभातील लोकांची कोव्हिड टेस्ट केली जाईल. अशी माहीती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.