जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभार

रत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या कारभार आता सरपंचांऐवजी अधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण ८४१ ग्रामपंचायती आहेत. थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय लागू झाल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणूकांना विशेष महत्व आले आहे.

मुदत संपणार असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक गावांमध्ये इच्छुकांनी जनसंपर्क सामान्यांची कामे आणि विविध सामाजिक उपक्रम अशा माध्यमातून तयारी सुरु केली होती. काही ग्रामपंचायतींमध्ये तर सरपंचपादासाठी राजकारण सुरु झाले होते. मात्र शासनाच्या प्रशासक नियुक्तीच्या निर्णायामुळे सर्व राजकीय घडामोडी थांबल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे. त्यापूर्वी १२ ग्रामपंचायतीवर प्रशासक कार्यरत होते. त्यामुळे आता ४६६ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे.