रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमांसह देवस्थान व पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. पन्नास पेक्षा कमी व्यक्तींचा सहभाग, मास्क, शारिरीक अंतर, सॅनिटायझर सुविधांची कसून तपासणी केली जाणार आहे. तशा सुचना अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतील तीन दुकान चालकांना तहसिल प्रशासनाकडून कडक सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना थंडावत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा उचल खाल्ली आहे. फिरण्यासाठी वाहने सहज उपलब्ध होत असल्यामुळे विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रमांमधील सहभागही वाढला आहे. कोरोनातील निकषांचे पालनही केले जात नाही. गेल्या सहा दिवसात रुग्णांचा आकडा वाढल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात तहसिलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने तपासणीही सुरु केली आहे. शुक्रवारपासून मंगल कार्यालयांची तपासणी करण्यास सुरवात झाली आहे. कार्यालयात पन्नास 50 लोकांना परवानगी दिलेली आहे. तिथेही मास्क, सोशल डिस्टन्स यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हॉटेलमधील लोकांच्या उपस्थितीची तपासणी केली आहे. दुकाने किंवा हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी सॅनिटायझर सुविधा अत्यावश्यक केली आहे. नियमांचे पालन केले नसेल तर सुरवातीला नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतरही पालन होत नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी क्लासेसना परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही हे वर्ग सुरु असतील तर कोरोनाच्या नियमावलींचे तिथे पालन होते किंवा नाही याची तपासणी केली जाईल.
दरम्यान रत्नागिरीतील दोन ते तीन मेडीकल व्यवसायिकांनी सॅनिटायझरची व्यवस्था केली नसल्याचे आढळून आले होते. त्यांना तंबी देण्यात आली आहे. तसेच एका ग्रामपंचायत क्षेत्रात मास्क न लावलेल्या व्यक्तींवर 1000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. अनेक धार्मिक स्थळांवर मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. त्यासाठी सोमवारी (ता. 22) देवस्थानच्या ट्रस्टींना सुचना दिल्या जातील. मास्क नसलेल्यांवर कारवाई करा असे आदेश काढले जाणार आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनातील नियमांचे कसून पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.