रत्नागिरी:- कोरोनातील कठीण परिस्थितीत गावपातळीवर कोरोना योध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक मंडळी पार पाडत आहेत. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीत 627 ग्रामसेवक आहेत. कोरोनापासून गाव सुरक्षित ठेवण्यापासून ते अगदी ग्रामस्थांना लागणार्या सोयीसुविधांसाठी कार्यरत आहेत. शहरापासून दूरवर असलेल्या गावात ग्रामसेवकांची भुमिका महत्त्वपूर्ण ठरत असून अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ग्रामसेवकांना शाबासकीची थाप दिली आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा चांगलाच परिणाम जिल्ह्यात जाणवत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवताना प्रशासनालाही कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाडी-वस्तीवर होत आहे. आरोग्य यंत्रणा पोचवण्यासाठी ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कोरोना बाधितांचा शोध घेणे हा त्याचा उद्देश असून गृहा भेटीतून प्रचार व प्रसारही केला जातोय. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा व ग्रामस्थ यांच्यात ग्रामसेवकाची भुमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांच्याबरोबरीन ग्रामसेवकही या पथकात काम करत आहेत. गावात योजना राबविण्यात हीच यंत्रणा सर्वात महत्त्वाची ठरत आहे. आतापर्यंत होम आयसोलेशन, कंटेनमेंट झोन बनविण्यापासून ते अगदी कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती शासनाकडे पाठविण्यापर्यंत प्रयत्न सुरु आहेत. कोरोनामुक्त गावे ठेवण्यासाठी ग्रामसेवकांची भुमिका महत्त्वाची आहे.
गावागावांसह बाजारपेठ परिसरात सॅनिटायझर, घरोघरी धान्य वाटप, परजिल्ह्यातून येणार्या मजूरांना राहण्याची व्यवस्था अशा प्रकारची कामेही याच मंडळींमार्फत सुरु आहेत.
दरम्यान, गुहागर दौर्यावर असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी गावपातळीवर सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले आहे. ग्रामसेवकांसह ग्रामकृतीदलांनी पहिल्या लाटेत महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्याप्रमाणे सध्या माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या प्रयत्नामधूनच निश्चितच ही लाट थोपवण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला.