Saturday, May 2, 2026
spot_img
Home सांस्कृतिक घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन; आज काही ठिकाणी तिखट्या नैवेद्याचा सण

घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन; आज काही ठिकाणी तिखट्या नैवेद्याचा सण

रत्नागिरी:- मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाच्या आगमनानंतर चार दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे आगमन प्रथेप्रमाणे आणि तितक्याच पारंपारिक, भक्तीमय वातावरणात झाले आहे. या लाडक्या गौराईचे मोठय़ा थाटात महिला, कुमारीकांनी त्या त्या ठिकाणच्या पाणवठ्यावरून आगमन केले.

महिलांनी आपल्या लाडक्या गौराईला साजशृंगार करून तिला नटवून गणरायाच्या शेजारी प्रतिष्ठापना केली आहे. आगमनानंतर गौराईचा अगदी लाडाने पाहुणचार केला जातो. आता तिच्या स्वागताचा जागर रंगणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत होतो. जिल्हय़ात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. या गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी…वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱया दिवशी गौरी येतात. गणरायापाठोपाठच चार दिवसांनी मंगळवारी लाडकी माहेरवाशीण असलेल्या गौराईचे महिलांनी अगदी मोठय़ा थाटात आणि उत्साहात आगमन करण्यात आलेले आहे. घरोघरी तिचे विधीवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आता दोन दिवस सार्या महिला गौराईचा पाहुणचाराचा जागर तितक्याच लाडाने करण्यात दंग राहणार आहेत.

विविध प्रांतानुसार गौरी पूजनाची प्रथा आहे. गौरी पूजन सोहळा प्रत्येक भागानुसार वेगवेगळी परंपरा आहे. वेगळी परंपरा प्रत्येक प्रांत आणि भागाप्रमाणे गौरी उत्सवाची पद्धत बदलते. कोकण असो वा इतर प्रांत असो, या भागात उत्सवाची वेगळी पद्धत पहायाला मिळते. पण, महिलांच्या या सणात भक्तीभाव एकच असतो. माहेरवाशीण असलेल्या गौराईचा तितक्याच लाडाने पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी नवविवाहीता माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरींची, तर खडय़ांच्या गौरींची पद्धत आहे.

गौरी आवाहन करुन गावोगावी गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी विहीरीवरुन, नदीवरुन सात खडय़ांच्या रुपात गौरी आणली जाते. तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवुन त्यांची पुजा व आराधना केली जाते. बऱ्याच भागात लाकडी गौरी किंवा त्यांचे मुखवटेही असतात. अशा या लाडक्या गौराईचे मोठय़ा थाटात महिला, कुमारीकांनी त्या त्या ठिकाणच्या पाणवठ्यावरून आगमन केले. घरी आल्यानंतर महिलांनी आपल्या लाडक्या गौरीचा साजशृंगार करून तिला नटवण्यात आले. आता दोन दिवस महिलांकडून गौराईची आराधना, आरती, विविध गीते, गाणी असा तिच्या पाहुणचाराचा जागर रंगणार आहे.