रत्नागिरी:- दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने दहावीतील विद्यार्थिनीने थेट आपलं आयुष्यच संपवल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील खेडशी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने बुधवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली.
अनुष्का अमित चिपरीकर (१६, खेडशी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. बुधवारी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी परतली. दहावीचा गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनी प्रचंड तणावाखाली होती. याच तणावातून बुधवारी दुपारी अनुष्का हिने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. अनुष्का हिने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करत मृतदेह शव विछेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. अनुष्का हिने आत्महत्या केल्याची बातमी परिसरात पसरताच तिच्या घराबाहेर ग्रामस्थानी गर्दी केली होती.









