कालिदास संस्कृत विद्यापीठ उपकेंद्राचे पहिले पाऊल

मंत्री उदय सामंत ;कार्यालय सुरू,संस्कृती जपणारा उपक्रम

रत्नागिरी:- रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत उभारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यासाठी प्रभारी कुलसचिव रामचंद्र जोशी आणि सहकाऱ्यांची टीम रत्नागिरीत दाखल झाली आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा हा मोठा उपक्रम आहे. आगामी तीन वर्षांमध्ये प्रत्येक कॉलेजचा कॅम्पस येथे असणार आहे. रत्नागिरी हे पुणे, मुंबई, नागपूर प्रमाणे शैक्षणिक हब तयार होईल, असा आत्मविश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, विद्यापिठाचे प्रभारी कुलसचिव श्री. जोशी व त्यांची टिम उपस्थित होती. सामंत म्हणाले, काही महिन्यांपूर्वी मी कवि कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत सुरू करण्याची घोषणा केली होती. आता प्रत्यक्ष त्याच काम सुरू झाले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अरिहंत संकुल गाळा क्र. ३३ व ३४ मध्ये तिसऱ्या मजल्यावर हे कार्यालय आहे. आगामी आठ दिवसांमध्ये अभ्यासक्रमासाठी नावनोंदणी होणार आहे. संस्कृत भाषेशी संबंधित असलेले विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा यात समावेश असणार आहे. एम.ए. संस्कृत साहित्य, मल्टी डिसीप्लीनरी, ज्योतिष, योगशास्त्र, दर्शनशास्त्र, बी.ए. संस्कृत. बीए योगशास्त्र, आदी. पारंपरिक शिक्षणपद्धती, वास्तूशास्त्र, आधुनिक अभ्यासक्रम, रोजगार निर्मिती, लोकभाषा, कोकणी, संगमेश्वरी, मालवणी भाषा आदीवर संशोधन केले जाणार आहे. सहा महिने, वर्ष, २ वर्षांचे हे कोर्सेस असणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करण्याची संधी मिळाली.आता रत्नागिरी देखील शैक्षणिक हब होईल, यादृष्टीने आमचा वाटचाल सुरू आहे. रत्नागिरीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. शहरातील रस्ते, खड्डे याच्या पलिकडे जाऊन महाराष्ट्राची संस्कृती जपणारे महाराष्ट्रातील पहिले उपकेंद्र रत्नागिरीत होत आहे, याचा मला अभिमान आहे.

रत्नागिरी उपकेंद्रांचे जनक ना. सामंतांचे कौतुक

आम्ही पहिल्यांदा असा मंत्री पाहिला की, त्यांचे या क्षेत्रामध्ये बारीक लक्ष आहे. शैक्षणिक भूमिका समाजाशी जोडण्याचे काम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. विद्यार्थी, वसतिगृह, संस्था, महाविद्यालय आदींचा विकासावर त्यांचा भर आहे. शैक्षणिक क्षेत्राला वेगळा आयाम देणारे हे आगळेवेगळे मंत्री आहेत. कवि कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांचे जनक म्हणूनच उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाईल, असे कौतुक यावेळी प्रभारी कुलसचिव रामचंद्र जोशी यांनी केले.