रत्नागिरी:- साखरतर गावासाठीच्या पाणी योजनेतील मुख्य वाहिनीवरुन म्हामुरवाडी गावासाठी दिलेली जोडणी बेकायदेशीर आहे. त्याचा साखरतरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ती जोडणी तत्काळ काढून टाकावी अशी मागणी साखरतर ग्रामस्थांनी एका निवदेनाद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
साखरतर गावासाठी जलस्वराज्य टप्पा 2 मधून पाणी योजना मंजूर झाली आहे. त्याचे काम जवळजवळ संपूष्टात आले आहे. गावातील विहीरीपासून साठवण टाकीपर्यंत गेलेल्या मुख्य वाहिनीवर म्हामूरवाडी गावासाठी व्हॉल्व टाकून पाणीपुरवठा सुरु केला आहे. या प्रकाराला साखरतर ग्रामस्थांचा विरोध आहे.
रायझिंग मेन लाईनवर अशा प्रकारचे कोणतीही जोडणी देण्याचा कोणालाही अधिकार नाही. तरीही हा प्रकार करण्यात आला आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच किंवा पणीपुरवठा कमिटीच्या सदस्यांना विश्वासात घेतलेले नाही. मुख्य वाहीनीवर दिलेली जोडणी पूर्णपणे बेकायदेशिर आहे. याला जीवन प्राधीकरणच्या अधिकार्यांचीही मुक संमती आहे. त्यांची संबंधित खात्यामार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. ठेकेदाराने संबंधित अधिका-यांना विश्वासात न घेता तर व्हॉल्व टाकला असेल तर त्यांच्या विरुध्द कारवाई झाली पाहीजे. सध्या साखरतरसाठी अस्तित्वात असलेल्या केळये आंबेकोंड येथील विहिरीवर नवीन पंप बसवून तेथील साठवण टाकीतून म्हामुरवाडी गावासाठी घरोघरी नळ कनेक्श देऊन पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. दोन्ही योजना एकाच वेळी मंजूर झाल्या असल्या तरी त्याचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. तरीही अशाप्रकाची जोडणी देण्यात आली आहे. ती त्वरित काढून टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. या सर्व प्रकाराला सरपंच जबाबदार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
मुख्य वाहिनी सुमारे सहा किलोमीटर लांब आणि पाच इंच व्यासाची आहे. त्यावर व्हॉल्व बसवल्यामूळे पाण्याचा जोर कट होउन साठवण टाकी भरण्यास विलंब होतो. त्याचा आमच्या योजनेवर परिणाम होणार आहे. याबाबत ग्रामस्थ इरफान अब्बास साखरकर, निसार राजपूरकर, महम्मंद राजवाडकर, शहानवाझ पटेल यांच्यासह दहा जणांच्या सहीचे पत्र मंत्री सामंत यांना देण्यात आले.