रत्नागिरी:- कोरोनाच्या तपासण्या कमी केल्यामुळे बाधितांचा आकडा कमी होत होता; परंतु अधिवेशनाच्या तोंडावर तपासण्या वाढविल्याने रुग्ण अधिक दिसतात. विधानसभा अधिवेशनात काट-छाट करण्यासाठी रुग्ण वाढल्याचे दाखवू नये, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीला दिला.
कोकणातील धनगर, आदीवासी पाड्यांची पाहणी करण्यासाठी दौर्यावर आले असता रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समाचार घेतला. कोरोना प्रादुर्भावासंदर्भात राज्य सरकारच्या भुमिकेवर त्यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुर्वीच सांगितले होते की कोरोनाच्या चाचण्या कमी करु नका. मात्र माझी कुटूंब माझी जबाबदारी मोहीम घरातून राबविणार्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना कमी झाल्याचे दाखवण्यासाठी तपासण्यांवर लक्ष दिले नाही. सध्या त्या तपासण्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. याला राज्य शासनाचे धोरण जबाबदार आहे. विधानसभेच्या अधिवेशनात काट-छाट करण्यासाठीच हा प्रयत्न सुरु आहे. तसे आम्ही होऊ देणार नाही.
दुर्लक्षित आणि उपेक्षित धनगरवाड्या, आदीवासी पाडे याकडे राज्य सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. कोकण आमचा बालेकिल्ल एवढेच म्हणण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. संघटनेअभावी या पाड्यातील लोकं आवाज उठवू शकत नाहीत. त्यासाठी दौरे करुन प्रत्येक पाड्यातील तरुणांना आपल्या आमदारांना जाब विचारण्यासाठी तयार करणार आहे असल्याचे पडाळकर यांनी सांगितले.